⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

असे होते छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज असे होते | Chhatrapati Shivaji Maharaj was like that

आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम.. महाराsssssज गडपती, गजअश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्नश्रीपती, अष्टवधानजागृत, अष्टप्रधानवेष्टित, न्यायालंकारमंडित, शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत, राजनितिधुरंधर, प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.

तुम्ही वर जे वाचलंय तिला गारदअसे म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दरबारात प्रवेश करत असताना ही घोषणा/ललकारी दिली जायची.  गारद म्हणजे “बिरुद” किंवा बिरुदावली” तर ऊर्दु भाषेत अल्काब असे म्हटले जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधी या बिरुदावलीतील प्रत्येक बिरुद सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व एवढ्या पुरतंच मर्यादित नाही. ३५० वर्षेनंतरही आज लोकशाही असतांना सुद्धा जो राजा आपल्या प्रजेच्या मनावर अधिराज्य गाजवतोय म्हणजे त्यांच्यात काहीतरी जगावेगळे वैशिष्ठ नक्कीच असणार.

छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहास तुम्हा-आम्हाला ४थी च्या वर्गापासूनच शिकवला गेला आहे. आपल्या पैकी जवळपास प्रत्येकालाच शिवाजी महाराजांना जीवन प्रवास माहित आहे. म्हणून या लेखात त्यांच्या जीवनातील घडामोळी बरोबरच छत्रपती शिवाजी महाराज एक व्यक्ती म्हणून कसे होते, आणि ते आजही सामान्य माणसाला इतर कुठल्याही कल्याणकारी राज्यापेक्षा इतके का प्रिय आहेत? हे जाणून घेणार आहोत. महाराजांच्या दैदिप्यमान कारकिर्दीचा हा धावता आढावा.

छत्रपती शिवाजीराजे जयंती प्रश्नमंजुषा स्पर्धा

छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शिवाजी महाराज फोटो,छत्रपती शिवाजी महाराज भाषण,छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक,छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा,छत्रपती शिवाजी महाराज की जय,छत्रपती शिवाजी महाराजांचे भाषण,छत्रपती शिवाजी महाराज फोटो hd

छत्रपती शिवाजी महाराज परिचय

  • नावछत्रपती शिवाजी राजे भोसले
  • वडीलशहाजी राजे भोसले
  • आईजिजाबाई शहाजी राजे भोसले
  • भाऊ- संभाजी शहाजी राजे भोसले, एकोजी शहाजी राजे भोसले(सावत्र)
  • जन्म१९ फेब्रुवारी १६३० (वैशाख शुद्ध तृतीया)
  • जन्म ठिकाणकिल्ले शिवनेरी, पुणे
  • मृत्यू३ एप्रिल १६८० किल्ले रायगड
  • पत्नीकाशीबाई, गुणवंतीबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई, सईबाई, सकवारबाई, सगुणाबाई, सोयराबाई
  • मुलेछत्रपती संभाजी राजे भोसले, छत्रपती राजाराम राजे भोसले
  • मुलीअंबिकाबाई महाडीक, कमळाबाई, दीपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, राणूबाई पाटकर, सखुबाई निंबाळकर
  • राज्याभिषेक६ जून १६७४
  • राजधानी– किल्ले रायगड
  • राजघराणेमराठा भोसले
  • शासनकाळ१६७४-१६८०
  • उत्तराधिकारी- छत्रपती संभाजी राजे भोसले
  • चलनहोन, शिवराई, (सुवर्ण होन, रुप्य होन)
  • राजब्रीदवाक्य– ‘प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।

भोसले वंशावळ

बाबाजी राजे भोसले यांच्यापासून महाराष्ट्राला भोसले घराणे परिचित आहे. त्याआधीची ही वंशावळ उपलब्ध आहे पण त्यामध्ये इतिहासकारांत मतमतांतरे आहेत. ही वंशावळ राजपूत सिसोदिया राजघराण्या पर्येन्त जाते आणखी मागे गेल्यास मग प्रभू रामचंद्रा पर्येंत जाते. पण तूर्तास आपण महाराष्ट्रा पुरते पाहिल्यास बाबाजी राजे हे भोसले घराण्याचे प्रथम व्यक्ती म्हणून समोर येतात. त्यांच्या पासून सुरु होणारी वंशावळ खाली देत आहोत.

भोसले वंशावळ

छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शिवाजी महाराज फोटो,छत्रपती शिवाजी महाराज भाषण,छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक,छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा,छत्रपती शिवाजी महाराज की जय,छत्रपती शिवाजी महाराजांचे भाषण,छत्रपती शिवाजी महाराज फोटो hd

शिवजन्मा पूर्वीचा इतिहास

असे म्हणतात चांगला सेनापती चांगला राजा असेलच अस नाही. किंवा चांगला राजा चांगला सेनापती असेलच असेही नाही. युद्ध जिंकण, लढाया जिंकण ह्यापलीकड जिंकलेल्या राज्यातल्या माणसांची मन जिंकण अतिशय अवघड असतय. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने युद्धकाळात प्रधानमंत्री म्हणून विन्स्टन चर्चिल ह्यांना निवडल होत, मात्र युद्ध संपल्यावर झालेल्या निवडणुकीत त्यांना विजय मिळू शकला नाही.

शिवाजी महाराजांचं मोठेपण दिसून येत ते इथच. आधी आणि नंतरही कदाचित युद्धशास्त्र ,लढाईचा आवाका ह्या निकषावर त्यांच्यापेक्षा जास्त शूर, पराक्रमी राजे होऊन गेलेले असतील. मात्र युद्ध जिंकण्यापलीकडे काय करायला हव ह्याच अचूक भान असलेला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

स्वप्न सगळेच पाहतात, काही लहान काही मोठे, तर काही आवाक्यातले काही आवाक्याबाहेरचे. मात्र जिजामातांनी बघितलेलं स्वप्न अशक्यप्राय आणि प्रचंड मोठा आवाका असलेल होत. आपल्या भूमीवर आपलच राज्य असाव, स्वराज्य असाव हे स्वप्न. हे स्वप्न सत्यात उतरलं जेंव्हा शिवाजी महाराजांचा जन्म झाला, पण त्या आधीची परिस्तिथी काय होती? काय करत होतं भोसले घराणं? हे समजून घेणेही तेवढंच महत्वाचं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशावळीतील बाबाजी भोसले यांचा जन्म १५३३ साली झाला. त्यांना मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले हे दोन पुत्र! त्यापैकी मालोजी राजे यांचे पुत्र म्हणजे- शहाजी राजे आणि शरीफजी राजे. आज या नावांवरून अनेक जण प्रश्न उपस्थित करतात की, मालोजी राजांच्या दोन्ही पुत्रांच्या नावामध्ये इस्लामी नावांचा प्रभाव डोकावतो. या मागेही एक इतिहास आहे.

लग्नाला बरीचशी वर्षे उलटून गेल्यानंतरही मालोजी राजांना मुल होतं नव्हतं. तेव्हा तत्कालीन अहमदनगर छावणी बाहेर असणाऱ्या शाह शरीफ दर्ग्याची ख्याती मालोजींच्या कानावर आली. या दर्ग्यात जे काही मनोभावे मागितलं जातं ते पूर्ण होतेच अशी भाविकांमध्ये श्रद्धा होती. त्यानुसार मालोजी राजांनी संतान प्राप्तीसाठी दर्ग्यात नवस बोलला आणि नवस पूर्ण झाल्यास होणाऱ्या मुलाला तुझे नावदेईन असा शब्द दिला.

पुढे मालोजींना दोन पुत्र झाले. दिलेल्या वचनाला जागले पाहिजे या भावनेतून मालोजी राजांनी दर्ग्याच्या नावातील शाहया शब्दावरून एका मुलाचे नाव शहाजीठेवले आणि शरीफया शब्दावरून दुसऱ्या मुलाचे शरीफजीअसे नामकरण केले. तसेच या निमित्ताने दर्ग्यावर रोज नगाऱ्याची नौबत वाजवण्याची प्रथा त्यांनी सुरु केली.

आजही अहमदनगरमध्ये हा दर्गा पहावयास मिळतो. शाह शरीफच्या दर्ग्याचे जे विद्यमान मुजावर आहेत त्यांना या गोष्टीचा अभिमान आहे की या दर्ग्याचे महापराक्रमी भोसले घराण्याशी नाते आहे. आजही भोसले घराण्याकडून दर्ग्याला वर्षासन मिळते आणि भोसले घराण्यातील मंडळी कधी कधी येथे दर्शनासाठी सुद्धा येतात.

पुढे ही दोन्ही मुले पराक्रमी व कर्तृत्वान निघाली. आजच्या पिढीला माहित नसेल पण इतिहासामध्ये भातवडीचं युद्धम्हणून एक लढाई प्रसिद्ध आहे. ३१ ऑक्टोबर १६२४ रोजी ही लढाई लढली गेल्याची नोंद आहे. अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही मुळापासून नष्ट करण्यासाठी भारतभरातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. पण ते तितकेसे सोपे नव्हते, कारण निजामशाहीकडे शहाजी राजे आणि शरीफजी राजे हे भोसले घराण्यातील २ पराक्रमी योद्धे होते.

तलवारी भिडल्या आणि निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे आणि शरीफजीराजे निजामशहाचा वजीर मलिक अंबरच्या साथीने भल्या मोठ्या शत्रू पक्षांच्या सेनेला कापत सुटले. अशक्य वाटणाऱ्या या युद्धात शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला, पण त्यांना आपले बंधू शरीफजी राजे यांना मात्र गमवावे लागले. जर शरीफजी राजे जास्त काळ जगले असते, तर मराठ्यांच्या इतिहासामध्ये अजून काही पराक्रमी गाथांची नोंद नक्कीच झाली असती !

शहाजी राजे निजामशाहीत मोठे सरदार होते. त्यांच्याकडे पुण्याची जहागिरी होती. शहाजी राजे यांचा विवाह लखुजी जाधव यांच्या कन्या जिजाबाई यांच्याशी झाला. शहाजी राजेंचा आणखी एक विवाह तुकाबाई मोहिते यांच्याशी झाला. त्यांच्या पासून त्यांना पुत्र झाला त्यांचे नाव एकोजी राजे. शिवाजी महाराजांच्या आधी शहाजी-जिजाबाई यांना एक पुत्र झाला त्यांचे नाव संभाजी. संभाजी नेहमी शहाजी राजें बरोबर असायचा. शहाजी राजेंचं जीवन खूप धकाधकीचं होत. सतत त्यांच्या मोहिमा ठरलेल्या असतं म्हणून दुसऱ्या गरोदरपनात जिजाबाई शिवनेरी किल्ल्यावरून पुण्याचा कारभार चालवीत असत.

छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शिवाजी महाराज फोटो,छत्रपती शिवाजी महाराज भाषण,छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक,छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा,छत्रपती शिवाजी महाराज की जय,छत्रपती शिवाजी महाराजांचे भाषण,छत्रपती शिवाजी महाराज फोटो hd


शिवाजी महाराजांचा जन्म

शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० (वैशाख शुद्ध तृतीया) रोजी शिवनेरी किल्यावर झाला. जन्म शिवनेरी किल्यावर झाल्यामुळे बाळाचे नाव शिवाजीठेवण्यात आले. शिवाजी महाराजांचे एकूण जीवन पाहता त्याच्यावर त्यांच्या माता-पित्यांचा खूप प्रभाव होता. हिंदवी स्वराज्य झाले पाहिजे हे कल्पना फक्त शिवाजी महाराजांची नव्हती तर शाहजी राजे व जिजामाता याच्या अंतर्मनात नेहमीच त्याबद्दलची आग धगधगत होती. आणि हे स्वप्न शिवबा नक्कीच पूर्ण करेल याची त्यांना खात्री होती.

त्या दृष्टीने जिजाऊनी बाल शिवबावर संस्कार करायचे सुरु केले. भाषा, राजकोष व्यवहार, न्यायदान आणि युद्धकलेचे शिक्षण शिवाजी महाराजांना जिजाऊंच्या देखरेखेखाली लहान वयातच सुरु झाले. बाळही अगदी आईच्या शब्दाबाहेर जायचे नाही. आपल्या घरात शूरवीर पराक्रमी पुरुष जन्माला याची त्यांना खात्री झाली. पुढे त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विचार शिवाजी महाराजांसमोर बोलून दाखवला. अर्थातच शिवाजी महाराजांनी तो सत्यात उतरवला.

शिवाजी महाराजांच्या आठ पत्नी

त्याकाळी लहान वयात लग्न केली जात होती. राजे, सरदार, जहागीरदार, यांचे अनेक विवाह व्हायचे त्यामागे अनेक राजकीय कारणे असायची. शिवाजी महाराजांचे आठ विवाह झाले त्यामागेही तीच करणे होती. शिवाजी महाराजांचा पहिला विवाह १४ मे १६४० रोजी महाराज १० वर्षांचे असतांना सईबाई निबाळकर यांच्याशी शहाजी राजेंनी लावून दिला. सईबाई या शिवाजी महाराजांच्या मुख्य राणी होत्या तसेच त्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या आई होत्या.

शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाई मोहिते या होत. त्याच्यापासून त्यांना राजाराम नावाचा पुत्र झाला. पुढे शिवाजी महाराजांचे आणखी ६ विवाह झाले. हे विवाह करण्याचे प्रयोजन म्हणजे समस्त मराठा सरदार घराणे यांच्यात एकोपा निर्माण व्हावा, आपसातले वाद मिटले जावे, जेणेकरून स्वराज्य निर्माण करतांना स्वकीयांची अडचण येणार नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या मुलीही अनेक मराठा सरदार घराण्यात दिल्या.

रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा

शिवाजी महाराज हे न्यायप्रिय व्यक्ती होते, न्यायनिवाडा करतांना ते अत्याचारी हा कुठल्या जातीचा आहे किंवा कुठल्या गोत्राचा आहे हे अजिबात बघत नसत. ते कसे तर ते या घटनेवरून निदर्शनास येत. रांझे गावचा मोकादम (पाटील) बाबाजी बिन भिकाजी गुजर याने गावातल्या एका स्त्रीचा बदअंमल केला. महाराजांना कळल्यावर त्याला महाराजांसमोर हजार करण्यात आले.

दोन्ही बाजू ऐकल्यानंतर त्याचा गुन्हा सिद्ध झाला. महाराजांनी त्याची पाटीलकी जप्त केली आणि त्याचे हातपाय मारून दूर केलाम्हणजेच त्याचा चौरंगा केला. गुन्हेगाराला तात्काळ शासन आणि चांगल्या कामाला तात्काळ बक्षीस या तत्वामुळे शिवराय आपल्या सहकाऱ्यांवर आदर आणि आपुलकीचं नातं निर्माण करू शकले.

ही बातमी वाऱ्यासारखी सर्वदूर पसरली की शिवबा गुन्हेगाराला शिक्षा केल्या बिगर सोडत नाही. अत्याचाऱ्याला कडक शासन करतो गरिबाला न्याय देतो. विशेष म्हणजे हे न्यायदान करतांना महाराजांचे वय होते फक्त १६ वर्षे. एवढ्या लहान वयात इतकी प्रघल्भता बघून मावळातले तरुण त्यांच्या व्यक्तिमत्वाशी आकर्षित झाले. प्रत्येक तरुणाला वाटे की आपण शिवबाला या चांगल्या कामात साथ द्यावी.

गरीब मावळ्यांच्या मुलांशी शिवबाची मैत्री असे. शिवराय त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत. शिवराय गरीब मावळ्यांच्या घरी जायचे त्याच्या बरोबर आवडीने कांदाभाकर खायचे. जहागीरदाराचा मुलगा असूनही आपल्या घरची चटणी भाकर आवडीने खातो हे बघून मावळे थक्क व्हायचे शिवबा बद्दल असलेला आदर द्विगुणित व्हायचा. दऱ्याखोऱ्या तुडविणे, नवीन चोरवाटा शोधणे, त्यात लपंडाव खेळणे हे शिवबाचे खेळ. काही काळात या खेळात मावळेही पारंगत झाले.

हिंदवी स्वराज्य म्हणजे काय?

हिंदवी स्वराज्यम्हणजे काय? हिंदवी स्वराज्य म्हणजे नक्की कुणाचं राज्य? तर सिंधू नदीच्या पलीकडचे लोक म्हणजे हिंदू , आणि ते लोक ज्या प्रांतात राहतात तो प्रदेश हिंदुस्थान म्हणजेच हिंद. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, भूमिपुत्रांचं राज्य, एह्तदेशियांचं राज्य, जो इथल्या मातीतला आहे त्याच राज्य. ही इतकी सरळ आणि सोपी व्याख्या आहे हिंदवी स्वराज्याची.

आपण सर्वच जाणतो की शिवाजी महाराजांच्याआधी हिंदुस्थानावर परकीय लोकांचं राज्य होत जसे की मुघलशाही , निजामशाही, आदिलशाही कुठे फ्रेंच, कुठे पोर्तुगीज, तर कुठे इंग्रज अर्थातच हे सर्व परकीय आक्रमणकारी होते आणि हे आपसातच राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी एकमेकांशी लढाया करत.

यात भयानक रक्तपात होई तो इथल्या एह्तदेशियांचा, कारण बहुतेक सैनिक येथीलचं. लढाया करण्यासाठी प्रजेवर जुलमी कर लादला जात असे. सैन्यांची हालचाल करतांना शेती नष्ट होत असे, गावे लुटली जात असत, प्रजेचे हालहाल होत असत. राजा कुणीही असो प्रजेला मात्र कुणीही वाली नव्हता.

स्वतः वेगवेगळ्या शाह्यांमधे सरदार असूनही हे शाहजी राजांना कुठेतरी मनात टोचत होत अर्थातच त्यांनी जिजामाता यांनाही ही सल बोलून दाखवली असणार. आपल्या मातीवर आपलेच राज्य असायला हवे तर आणि तरचं आपल्या प्रजेवरच हे सुलतानी संकट दूर होऊ शकतं.

आणि मग हे संकट कसे दूर करता येईल, या मातीला या जुलमी राजवटी पासून कसे मुक्त करता येईल, इथल्या सामान्य मराठी जणांची यातून कशी सुटका करता येईल याची त्यांनी बाळ शिवबाचे संगोपन करतांना पुरेपूर व्यवस्था केली आणि हिंदवी स्वराज्यची कल्पना शिवरायांच्या बालमनावर कायमची कोरली गेली.

रायरेश्वराची शपथ

पुण्याच्या नैऋत्येला असलेले  रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते. तेथे १६४५ साली १६ वर्षाचे असलेले शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यांमधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तिथे जमली होती. शिवराय अजूनही वयाने कितीतरी लहानच होते. पण त्यांच्या पण यांच्या मनाची भरारी मोठी होती, त्यांनी एक मोठा घाट घातला होता. जमलेल्या सगळ्या मावळ्यांना ते कळकळीने म्हणाले.

‘‘गड्यानो, मी आज तुमहाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का. आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला येथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे. सर्व कसे छान चालले आहे. पण गड्यांनो मला यात मुळीच आनंद वाटत नाही सुलतानाने दिलेल्या वतनदारीवरच आपण संतुष्ट राहावे का? कायम दुसऱ्याच्या ओजळीने आपण पाणी का प्यावे. आपल्या चारही बाजूंनी अनेक परकीय राजवटी आहेत.

राज्य कुणीही जिंको अथवा राजा कुणीही बसो, त्यांच्यात नेहमी सुरु असलेल्या युद्धात आपली माणसे नाहक मारली जातात, त्यामुळे अनेकांची कुटुंबे देशोधडीला लागली आहेत. वर इतके सोसूनही आपल्या पदरी काय? तर गुलामगिरी. हे किती दिवस चालायचं? परकीय राजांसाठी आपण किती काळ खपायचे? आता तुम्हीच आम्हाला सांगा वतनाच्या लोभाने आम्ही हे असेच चालू द्यायचे का?

रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते मावळे शिवरायांच्या बोलल्याने थरारून गेले. त्यांना नवी स्फूर्ती मिळाली. आपण हे बदलण्यासाठी काहीतरी केले पाहिजे याची त्यांना जाणीव झाली. त्यापैकी एकजण म्हणाला बाळराजे, आपले मनोदय सांगा आम्हाला तुम्ही जे सांगाल ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रसंगी आम्ही आमचा प्राण द्यायलाही तयार आहोत

मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले. एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले, ‘’गड्यानो आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे, वेळप्रसंगी सर्वांनी प्राण घ्यायला आणि द्यायलाही तयार व्हायचे. आजपासून आपल्या सर्वांचे एकच ध्येय ते म्हणजे हिंदवी स्वराज्य”. तुमचे, माझे, आपल्या रयतेचे, साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. बस्स झाले, परकीयांची गुलामी आता नको. उठा, या रायरेश्वराच्या साक्षी ठेऊन आपण प्रतिज्ञा करू. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्येंत स्वराजस्थापनेसाठी लढत राहणार.

स्वराज्याचे तोरण तोरणा गड

रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली खरी, पण केवढे अवघड कार्य होते ते, दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीझ व जंजिऱ्याचा सिद्दी अशा चार सत्ता त्या वेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या. या सत्तांचा दरारा मोठा होता. त्यांच्याविरुद्ध ब्र काढायची सुद्धा हिम्मत कुणाची होत नसे. अशा बिकट परिस्थितीत शिवराय आणि मावळ्यांनी स्वराज्याचा प्रण केला होता.

कुठे शत्रूच्या फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांचे मावळे, त्यावयात ते मावळ्यांचं सैन्य कसलं? अल्लड वयात आलेली लहान पोरेच ती. परंतु शिवरायांचा निश्चय अढळ होता. त्यातूनच मावळ्यांमध्ये बळ निर्माण झाले. आणि या चारही मदमस्त सत्तासह्यांशी दोन हात करायला ही छोटीशी सेना उभी ठाकली.

शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीर होती. जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधीकाऱ्यांच्या ताब्यात होते. किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य, हे शिवाजी महाराजांना चांगलेच ठाऊक होते. ज्याचे किल्ले त्याचे राज्य, किल्ला ताब्यात असला, कि आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार. तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे, असे शिवरायांनी मनाशी ठरवले.

तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यांपुढे होता. पुण्याच्या नैऋत्येस चौसष्ठ किलोमीटरवर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे. किल्ल्यावर तोरनजाई देवीचे देऊळ आहे. त्यावरून त्या किल्ल्याला तोरणाहे नाव पडले. डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका. त्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या. एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची. माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरीत्या सपाट झालेल्या भागांची तटबंदी.

झुंजार माची नावाप्रमाणेच झुंजार आहे, लढाऊ आहे. किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे. ती आहे झुंजारमाचीवरून. ही वाट अतिशय अवघड आहे, वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळलाच समजा. महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो. एवढा प्रचंड किल्ला! पण आदिलशाहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते, की दारुगोळा नव्हता. शिवरायांनी हे हेरले.

हा तोरणा जिंकूनच स्वराज्याचे तोरण बांधायचे, असे महाराजांनी ठरवले. निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शीवराय कानद खोऱ्यात उतरले. साऱ्या मावळ्यांसह ते सिहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेले. मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या.

तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्याचे निशाण उभारले. येसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावाण सहकारी. त्याने चौकीवर पहारे बसवले. किल्ला ताब्यात आला. सर्वांनी शिवरायांचा जयजयकार केला. हिंदवी स्वराज्याची नौबत झडली. नगाऱ्यांचा आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला. शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगडअसे नाव दिले.

स्वराज्याची पहिली राजधानी

तोरणा गड जिंकल्यानंतर गडावर स्वराज्याचा कारभार सुरु झाला. गडाची बारीक पाहणी केली गेली, गडावर अधिकाऱ्यांच्या नेमणूका केल्या गेल्या. किल्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्ती करत असतांना सोन्यानं भरलेल्या ४ घागरी गडावर सापडल्या. स्वराज्याच्या कार्यासाठी एकाएकी एवढे धन सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आला. हे धन स्वराज्याच्या कामी आले.

महाराजांनी या धनाचा उपयोग करून शस्त्रे विकत घेतली, दारुगोळा विकत घेतला. उरलेल्या धनाचा स्वराज्याच्या पुढील कार्यात उपयोग करण्यासाठी त्यांनी एक योजना आखली. तोरणा गडापासून पूर्वेला १५ किलोमीटर अंतरावर मुरुंबदेवाचा डोंगर आहे. शिवरायांनी तो आधीच हेरून ठेवला होता. आदिलशहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता. अर्थातच या किल्याकडेही आदिलशाहाचे लक्ष नव्हते.

हा डोंगर खूप उंच, अवघड आणि मोक्याचा होता. अर्धवट बांधलेल्या किल्यावर पाहारही ढिल्लाचं होता. स्वराज्याच्या राजधानी साठी हा किल्ला आदीलशाहकडून जिंकून घ्यायचा हे शिवरायांनी ठरवले व त्यासाठी तात्काळ मोर्चेबांधणी सुरु केली.

एक दिवस शिवराय आपल्या निवडक मावळ्यांना घेऊन गडावर चाल करून गेले आणि किल्ला ताब्यात घेतला. तोरणा गडावर सापडलेले धन मुरुंबदेवाच्या डागडुजीसाठी खर्च केले. शिवरायांनी या किल्याला नाव दिले राजगड”. गडावर पाथरवटांनी दगड घडविले, लोहारांनी भाता फुंकला, सुतार, गवंडी, मजूर, भिस्ती अशी सारी माणसे कामाला लागली. राजवाडा, बारामहाल, अठरा कारखाने आणि राजगादी तयार झाली.

राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली. शिवराय शत्रूला उसंत देत नसत, त्यांची घोडदौड सुरूच होती. बारा मावळातील किल्यामागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. गावोगावचे पाटील देशमुख शिवाजी महाराज्यांच्या मुजर्याला येऊ लागले. पण काहींच्या पोटात दुखू लागले. शिरवळच्या आदीलशाही ठाणेदाराकडे शिवरायांविरुद्ध तक्रारी गेल्या. ठाणेदाराने विजापूरला सांडणीस्वार पाठवून शिवरायांच्या या घोडदौडीची हकीकत आदिलशहाच्या कानी घातली.

शहाजी राज्यांना अटक

एकीकडे शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्मितीचे प्रयत्न सुरु होते तर दुसरीकडे दक्षिणेत सहजी राजेंच्या मोहीम यशस्वी होत होत्या. शिवाजीराजे व वडील शहाजीराजे दोघेही यशाच्या शिखरावर विराजमान होऊ लागले होते. तोरणा जिंकला राजगड ही घेतला, राजगडावर राजधानीही बनवली. शिवरायांनी स्वराज्याचा राजकारभार मोठ्या जोमाने सुरु केला. कोंढाणा, प्रतापगड, पुरंदर हे किल्लेही मावळ्यांनी भराभर घेतले.

तिकडे शहाजीराजे आदीलशाही सोडून कुतुबशाह कडे जाण्याच्या तयारीत होते. याची भनक आदिलशहाला लागली, आदिलशाह काळजीत पडला. त्याच्या राज्यातले अनेक भाग शिवाजी राज्यांनी जिंकून घेतले होते. त्यामुळे विजापुरी आदिलशाह संतापाने बेभान झाला.

रणदुल्लाहखान हा शहाजीराजेंच्या जिवलग मित्र होता पण त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मुलगा मुस्तफाखान आणि अफजलखान हे शाहिदरबारी शक्तिशाली बनले. त्या दोघांनी शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी व स्वतः शिवरायांबद्दल आदिलशहाकडे तक्रारी करण्यास सुरवात केली. त्यामुळे अखेर शहाजीराजे व त्यांच्या दोन्ही पुत्रांना अटक करून त्यांचा बंदोबस्त करण्याचे ठरवले.

शहाजीराजे सारख्या शूरवीर व एकनिष्ठ सरदाराच्या मुलाने चालवलेली बंडखोरी आदिलशहाच्या जिव्हारी लागली. म्हणून शहाजीराजांना धमकीचे पात्र लिहून शिवरायांना आवरण्याची ताकीद दिली. वरून त्यांच्या दोन्ही पुत्रांचा बंदोबस्त करण्याचे मनोमन आदिलशहा ने ठरवले. त्यासाठी आदिलशहाने तिहेरी शक्कल लढवली. शहाजीराजांना अटक, शंभाजीचा पराभव आणि शिवाजी महाराजांचा कायमचा बंदोबस्त.

फरदीखानास संभाजी राजेंचा पराभव करण्याचे आदेश दिले, मुस्तफाखानास शहाजी राजेंना अटक करण्यास सांगितले तर, फत्तेखानास शिवाजी राजांचा बंदोबस्त करण्यासाठी पुण्याकडे पाठवून दिले. शहाजी राजांना मात्र या काटकारस्थानाचा सुगावा लागू दिला नाही कारण त्यावेळी ते जिंजीच्या वेढ्यात लढत होते. शहाजी राजांचे कर्तृत्व मुस्तफाखान चांगलाच ओळखून होता. त्यामुळे त्याने मोठी सावधगिरी बाळगली.

शाहजी राजेंसारख्या शूर योध्याला समोर जाऊन अटक करणे त्याला शक्य नव्हते. म्हणून शहाजीराजे बेसावध असतांना कपटाने अटक करण्याचे त्याने योजले. मुस्तफाखानाने अफजलखान, मुधोळचे घोरपडे वैगैरे अनेक सरदारांना राज्यांच्या छावणीवर राजे झोपेत असतांना अटक करण्याचे प्रयत्न केले. झोपेत असतांना हल्ला झाला तेंव्हा शहाजीराजे थोडे गोंधळले खरे पण लगेच सावध होऊन घोड्यावर बसून लढण्यास तयार झाले.

हातघाई झाली छावणीवर गोंधळ उडाला या गडबडीत शहाजीराजे घोड्यावरून खाली कोसळले. याच संधीचा फायदा घेऊन मुधोळच्या घोरपडेंनी राजांना कैद केले. शहाजीराजांचा विश्वासू हस्तक कान्होजी जेधे त्यालाही खानाने कैद केले व कनकगिरीस नेऊन ठेवले. स्वराज्य रक्षक फर्जंदही पदवी धारण करणारे शाहजीराजे संकटाच्या भोवऱ्यात सापडले. अफजलखानाने या अवस्तेत शहाजीराजांची जणू धिंडचं काढली.

कैद झालेल्या शहाजीराजांना आणण्यासाठी अफजलखानाची नेमणूक करण्यात आली त्यालाही तेच पाहिजे होते. त्याने ते काम मोठ्या आनंदाने व चोखपणे बजावले. राजेंना बेड्या घालून मार्च १६४९ ला विजापुरात आणण्यात आले. ७०० वर्षे रुपनायकाचे पूर्वज जिंजीस नांदत होते तेथे त्यांची अपार संपत्ती होती, सुमारे २० कोटी रुपयाची. हि सर्व संपत्ती व मौल्यवान वस्तू ८९ हत्तीवर लादून शहाजी राजेंना घेऊन अफजलखान जिंजीवरून सन १६४९ ला ३ महिन्या नंतर आदिलशहाकडे विजापुरी दाखल झाला.

शहाजीराजेंना कैद केल्या बरोबर आदिलशाहने बेंगलोर शहर व कोंढाणा किल्ला हस्तगत करण्यासाठी फौजा रवाना केल्या. इकडे फरदीखान शिवरायांचे थोरले बंधू संभाजी राजेंवर चालून गेला. संभाजीराजेंच्या स्वतःच्या १७ हजाराच्या फौजेस दक्षिणेतील संस्थानिकांनी पाठींबा दिल्याने त्यांच्याही फौजा येऊन संभाजी राजेंना मिळाल्या. त्या फौजेपुढे फरदीखानाची भंबेरी उडाली. संभाजी राजेंनी फरदीखानाचा सपशेल पराभव केला. पण हुकमाचे एक्के शहाजीराजे आदिलशहाच्या ताब्यात होते. अखेर राजगडावर शहाजीराजेंच्या अटकेची खबर आली.

इथे फत्तेखान स्वराज्यावर चालून आला होता पण शिवाजीराजांनी पुरंदरावर फत्तेखानाचा पराभव केला. बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्य़ंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मत्यू झाला.

शिवरायांनी आणखी विजय मिळवला पण ही आनंद साजरा करण्याची वेळ नव्हती. शहाजीराजेंना कपटाने अटक करून जखमी केले गेले होते. आता आदिलशाह शाहजीराजेंचं काय करणार याचा अंदाज बंधने कठीण झाले होते. हा विचार करून जिजाऊ आणि शिवरायांचा थरकाप उडाला होता.

केवढे भयंकर मोठे संकट स्वराज्यावर चालून आले होते, प्रश्न जिजाऊंच्या कुंकवाचा होता. अखेर शिवाजीराजांनी राजकारणाचा डाव टाकत मोगल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी (शहजादा मुरादबक्ष) पत्र पाठवून शहाजीराजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली.

हे पत्र पाठवण्याचा डाव यशश्वी झाला याचा परिणाम म्हणून शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजीराजांना कोंढाणा किल्ला, आणि शहाजीराजांना बंगळूर शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला.

रायगड पूर्वेकडील जिब्राल्टर

राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.

स्वराज्य स्थापनेच्या कार्यात अडचण येऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी सर्वच जहागिरी वतनदाऱ्या खालसा केल्या. पण काहींनी त्याला ताकदीने विरोध केला त्यातचं होता जावळीचा चंद्रराव मोरे. रायगड हा किल्ला चंद्रराव मोरेंच्या ताब्यात होता. आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे.

त्याला स्वराज्याच्या कार्यात कुरापती करू नये व जावळी स्वराज्यात विलीन करावी अन्यथा कारवाहीला सामोरे जाण्यास तयार रहा म्हणून अनेकवेळा पत्रव्यवहार केला. तर जेवणाच्या ताटावर बसलेले असाच तर तसेंच उठून हात धुवायला इथे याअशी मुजोरी चंद्रराव करीत असे.

इ.स. १६५४ नंतर आदिलशहाने अफजलखानला जावळीवर चालून जाण्याचा हुकूम दिला. त्यामूळे चंद्रराव व शिवाजीराजे यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला आणि त्याला धडा शिकविण्यासाठी शिवाजी राजांनी हा रायरीचा (रायगड) किल्ला सर केला आणि चंद्रराव मोरे महाराजांना शरण आला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला. ब्रिटिश लोक रायगडाला पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत.

अफजलखानाचा कोथडा

आदिलशाहने भोसले घराणे संपवण्याचा मनोमन विचारच केला होता. शहाजीराजेंच्या कुटुंबाला संपवण्यासाठी अगदी कुठल्याही थराला जायला तो तयार होता. त्याचीच प्रचिती आली १६५८ च्या कनकगिरीच्या लढाईत. या लढाईत शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराजांची कपटाने हत्त्या करण्यात आली, आणि ती हत्त्या केली आदिलशाहाच्या सर्वात बलवान सरदाराने, अर्थातच त्याचे नाव होते अफ़झलखान

पण शिवाजी राजेंचा बंदोबस्त कसा करावा या विचाराने त्याला झोप लागत नव्हती. शिवाजीराजेंना संपवण्यासाठी आदीलशाहने दरबारात विडा ठेवला. पण महाराजांच्या भीतीने हा विडा उचलायला कुणी सरदार तयार होईना. अखेर हा विडा उचलला तो अफझलखान यानेच.

अफझलखान हा अतिशय कपटी, निर्दयी आणि क्रूर सरदार होता. दगा देऊन हत्त्या करणे यासाठी तू कुप्रसिद्ध होता. आदिलशाहने त्याला आदिलीनावाची प्रसिद्द तलवार देऊन सन्मानित केले होते. शिवाय खानाला ढाल-गजनावाची अत्यंत प्रसिद्ध अंबारी देऊन गौरविण्यात आले होते. १०,००० सैनिकांच्या वैयक्तिक फौजेचे नेतृत्व अफझलखानाकडे होते. दक्षिणेस अफझलखानाची मोठी दहशत होती. असा हा खान स्वराज्यावर चाल करून येणार होता.

शिवरायांना याची कल्पना होती. १६५९ मध्ये, अफझलखान तोफा, हत्ती, घोडे आणि सैनिकांची भली-मोठी फ़ौज घेऊन स्वराज्याच्या दिशेने निघाला. महाराजांना त्याच्या मूळनिवासी पुण्याला गाठून त्याची हत्त्या करणे ही अफझलखानाची प्रारंभिक योजना होती. खुल्या मैदानावर खानाच्या फौजेसमोर आपला टिकाव लागणार नाही हे महाराजांना ठाऊक होते. म्हणून जावळीच्या घनदाट जंगलात असणाऱ्या प्रतापगडावर वास्तव्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.

इकडे अफझलखान आपल्या प्रचंड फौजेसह गावेच्यागावे उध्वस्त करत सुटला होता. वाटेत त्याने अनेक मंदिरे फोडली त्याला वाटलं असे केल्याने शिवराय चिडतील आणि खुल्या मैदानात लढाईला उतरतील. पण महाराज हे संयमी नेतृत्व होतं. असे अलगद खानाच्या जाळ्यात सापडतील ते महाराज कसले? खानाला स्वराज्यात येण्यास भाग पाडावे मग त्याच्याशी दोन हात करावे असा चंग महाराजांनी बांधला होता.

दोन्ही पक्षांच्या वकिलामार्फत अखेर खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येण्यास तयार झाला. शिवाजी महाराज अर्धी लढाई इथेच जिकंले होते. पण या लढाईचा शेवट इतका सोपा नव्हता. खान दगाबाजीसाठी कुप्रसिद्ध होता, शिवाय याआधीही त्याने शहाजी राजेंना कपटाने अटक केले होते व महाराजांचे थोरले बंधू शंभाजी राजेंची हत्या केली होती. आणि आताही भेटीवेळी तो दगाफटका करणार हे स्पष्टच होते.

भेटीचा दिवस ठरला मृत्यू १० नोव्हेंबर १६५९. खानाच्या छावणीपासून लांब प्रतापगडाच्या पायथ्याशी खास शामियाना सजवण्यात आला. खानाचे सैन्य शामियान्यापासून दूर वाईला असेल, दोन्हीकडील प्रत्येकी एक वकील व एक अंगरक्षक प्रत्यक्ष भेटीस्थळी उपस्थित असेल, महाराज आणि खान दोघेही निशस्त्र शामियान्यात भेटतील व वाटाघाटीच्या चर्चा करतील. ही भेटीची रुपरेषा ठरवण्यात आली. पण शब्दाला जागेल तो कसला अफझलखान.

म्हणून महाराजांनी अंगरख्याच्या आत लोखंडी चिलखत परिधान केले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसतं नव्हती. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू अंगरक्षक होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता.

धिप्पाड उंचपुऱ्या, बलदंड अफझलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी चपळाईने वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. दगा..दगा..दगा..

ही आरोळी एकूण सय्यद बंडा शामियान्यात धावत आला तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच होता जिवा म्हणून वाचला शिवाही म्हण प्रचलित झाली. जीव महाले आणि सय्यद बंडा यांची खडाखडी सुरु असताना अचानक अफझलखानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णीने महाराजांच्या डोक्यावर तरवारीचा वार केला. जिरेटोप असल्यामुळे महाराज थोडक्यात बचावले महाराजांनी तत्क्षणी तलवारीने कुलकर्णीचे दोन तुकडे केले.

आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. इथे आल्यावर ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले.

अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली. मृत्यूनंतर वैर संपते म्हणतात त्याचा प्रत्येय या घटनेतून येतो. अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापुरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजीने त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली.

इतक्या क्रूर बलदंड अफझलखानाला एकट्या शिवाजी महाराजांनी मारणे म्हणजे आश्चर्यच! या घटनेनंतर शिवाजी महाराजांचे शत्रू टरकले. इंग्रजही सावध झाले. युद्धभूमीवर नुसता शिवाजी आले रे..म्हटले की शत्रूचं सैन्य माघारी सैरभैर होऊन धावायला लागायचं.

या घटनेचा परिणाम असा झाला की शिवाजी राजांची कीर्ती भारतभर पसरली. आज पर्यंत इतर राजकीय घराणे शिवाजी महाराजांना एक शूर सरदाराचा बंडखोर पुत्रम्हणून ओळखत होते. या घटनेनंतर हे चित्र पूर्णपणे पालटले, भारतीय राजकारणाच्या पटलावर शेर शिवाजीनावाच्या महायोध्याचा उदय झाला होता.

छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शिवाजी महाराज फोटो,छत्रपती शिवाजी महाराज भाषण,छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक,छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा,छत्रपती शिवाजी महाराज की जय,छत्रपती शिवाजी महाराजांचे भाषण,छत्रपती शिवाजी महाराज फोटो hd

नरसिंह हे! नरसिंह हे!

 इंद्र जिमि ज़ृंभ पर

 बाडव सअन्भ पर

 रावण सदंभ पर

 रघुकुलराज है!

 

पवन बारिबाह पर

 संभु रतिनाह पर

 ज्यों सहसबाह पर

 राम द्विजराज है!

 

दावा द्रुमदंड पर

 चीता मृग्झुन्द पर

 भूषण वितुण्ड पर

 जैसे मृगराज है!

 

तेज तमअंस पर

 कन्ह जिमि कंस पर

 त्यों म्लेंच्छ बंस पर

 शेर शिवराज है

 शेर शिवराज है

 कविराज भूषण

पन्हाळ्यावरुन सुटका

अफझलखानाचा बंदोबस्त केल्यानंतर शिवाजी महाराजांनी आक्रमक भूमिका घेऊन ताबडतोड अनेक किल्ले आपल्या ताब्यात घेतले. याच मोहिमेवर असतांना डिसेंबर १६५९ मध्ये शिवाजी महाराज कोल्हापूर नजीक पन्हाळा किल्ल्याजवळ पोहोचले व याच सुमारास अदिलशाही सरदार रुस्तमजमान मिरजेपाशी येऊन पोहोचला.

रुस्तमजमान कडे अनेक मातब्बर सरदार होते जसे, अफझलखानाचा मुलगा फ़ाजलखान, मलिक इत्बार, सादतखान, याकुबखान, हासन खान, संताजी घाटगे इत्यादी व त्याचे सैन्यबळही खूप मोठे होते. शिवाजी महाराजांच्या सेनेत नेतोजी पालकर, हणमंतराव खराटे, हिरोजी इंगले, भिमाजी वाघ इत्यादी सरदार होते.

शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आहेत असे कळाल्यानंतर पन्हाळ्यावर आक्रमणकरण्याचा प्रयन्त रुस्तमजमाने केला. परंतु २८ डिसेंबरला पहाटेच अचानकपणे शिवाजी महाराजांनी रुस्तमजमानच्या सेनेवर गनिमी काव्याने हल्ला केला. पूर्ण जोरदार हल्ला न चढवता पुढून मागून आजूबाजूने तुकड्यांनी हल्ले चढवले व आदिलशाही सेनेला नामोहरम केले. रुस्तमजमान रणांगण सोडून पळून गेला.

सततच्या अपयशी लढायांमुळे आदीलशाह चिडला आणि त्याचा सेनापती सिद्धी जौहर यास पूर्ण ताकदीनिशी शिवरायांवर हल्ला करण्याचा आदेश दिला. त्यादरम्यान शिवाजी राजे मिरजेच्या किल्याला वेढा देऊन होते. सिद्धीला हि बातमी कळताच त्याने आपला मोर्चा तिकडे वळवला. महाराजांना सिद्धीच्या आक्रमणाची खबर लागली म्हणून महाराज पन्हाळगडावर गेले. सिद्दीला याचा सुगावा लागला त्याने गडाला वेढा घातला.

सिध्दीने गडावर येणारी सारी रसद तोडून टाकली, काही दिवस सर्वानी तग धरली मात्र सिद्धी वेढा उठवेल अशी लक्षणे दिसेनात. तेंव्हा सर्वांनी खलबते करून महाराजांना जवळच असलेल्या विशाळगडावर पोचवावे हा निर्णय घेतला. एके रात्री सिद्धीचे सैन्य गाफील असतांना, महाराज चोरवाटेने शिफातीने वेढा तोडून निसटले.

सिद्दीला याची खबर लागताच त्याने काही सैन्य देऊन सिद्दी मसऊदला महाराजांच्या पाठलागावर पाठवले. घोडखिंडीजवळ पोचल्यानंतर महाराजांचे विश्वासू साथीदार बाजीप्रभू देशपांडे यांनी विनंती केली कि महाराजांनी विशाळगडावर पोहचावे व तोफेच्या तीन डागण्या द्याव्या जेणेकरून महाराज सुखरूप गडावर पोचले याची खात्री होईल. तोपर्येंत घोडखिंडीत सिद्धीला झुंजवीत ठेवतो. महाराजांचा नाईलाज झाला.

बाजीप्रभूंच्या या विनंतीवजा हट्टापुढे महाराजांना या निर्णयाला मान्यता द्यावी लागली. बाजीप्रभूनी प्रयत्नांची शर्थ करत संख्येने कितीतरी पट असलेल्या सैन्याला खिंडीत रोखून धरले जोपर्येंत विशाळगडावरून तोफांचा आवाज आला नाही. अखेर महाराज गडावर पोचल्याची खातरजमा झाली, आणि तारवारीच्या घावांनी चाळणी झालेल्या शरीरातून बाजीप्रभूंनी प्राण सोडले.

महाराजांना हि बातमी मनाला खूप चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे स्वराज्यासाठी बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे ठेवले. बाजीप्रभूंच्या पवित्र बलिदानाने पावन झालेली पावनखिंड”.

लालमहाल आणि शाहिस्तेखान

शिवाजी महाराजांचे पराक्रम आणि कीर्ती आग्ऱ्यापासून ते तंजावर-जिंजीपर्यंत आणि गुजरातपासून ते बंगालपर्यंत होती, याचा पुरावा आहे बंगालचा सुभेदार शाहिस्तेखान. पुण्याचा लालमहाल स्वतः शहाजी राजांनी बांधून घेतला होता. आज आपण पुण्यात जो लालमहाल पाहतो तो खरा लालमहाल नव्हे. पुणे महानगरपालिकेने हा लालमहाल १९८८ साली बांधला. खरा लालमहाल कुठे गेला या बाबत इतिहासाला माहित नाही.

परकीय आक्रमकांनी पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता. पुण्याचा कारभार जेव्हा जिजाऊंच्या हाती आला तेव्हा शिवबाला घेऊन जिजाऊंनी सोन्याचा मुलामा असलेला नांगर चालविला होता. शिवरायांचं बालपण ही याच लालमहालात गेले. शिवरायांनी स्वतः राज्यकारभार चालवण्याचे धडे जिजाऊंच्या देखरेखीखाली याच लालमहालात गिरवले.

इ स १६६३ मध्ये मुघल बादशाह औरंगजेब याने आपल्या सख्या मामला शिवाजी राजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले. मिर्झा अमीर उल् उमरा हैबतजंग नबाब शाहिस्तेखान अबू तालिब हे त्याचे पदव्यांसकट नाव. तो तुर्कस्तान चा नवाब होता. त्याला लोक प्रतिऔरंगजेब म्हणत.

शाहिस्तेखानाला औरंगजेबाने दक्खनचे सुभेदार नेमले आणि स्वराज्यावर चाल करून शिवाजी राज्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यास बजावले. शाहिस्तेखान १ लाखाची फौज घेऊन पुण्यावर चालून आला. तत्पूवी त्याच्या बलाढ्य सेनेने ५६ दिवस लढून चाकणचा किल्ला घेतला. पुण्यात आल्या-आल्या त्याने जनतेला लुटून अन्याय अत्याचार करण्यास सुरुवात केली. आणि शेवटी लालमहालात तळ ठोकला.

औरंगजेबाला जरब बसवण्यासाठी शाहिस्तेखानाला जन्माची अद्दल घडवावी लागेल हे शिवरायांनी सहकार्यांशी चर्चा करतांना ठरवले. शिवरायांना लालमहालाची खडान्खडा माहिती होती. अंधाऱ्या मध्यरात्री मोजक्या मावळ्यांसह थेट लालमहालात घुसून खानाला कापावे अशी योजना आखण्यात आली आणि त्याची अंमलबजावणी केली. खानाचे नशीब बलवत्तर म्हणून खान वाचला. नुसत्या बोटांवर निभावलं. आणि खान पळून गेला.

शाहिस्तेखान पळून गेला तो परत कधी आलाच नाही, या घटनेनंतर मुघल राजवटीची पार अब्रू गेली. औरंगजेबाची हा फार लाजिरवाणा पराभव होता. त्याचा सक्खा मामा अक्षरशः जीव मुठीत घेऊन पळून आला होता. पुढे हाच शाहिस्तेखान मरेपर्येंत बंगाल प्रांताचा सुभेदार होता आणि आज बांग्लादेशातल्या ढाका येथे त्याचे थडगे आहे.

सुरतेची लूट

शिवरायांनी दोन वेळा सुरतेची लूट केली. सुरत मुघलांच्या ताब्यात होत, सुरत हे त्या काळी व्यापाराचा एक प्रमुख केंद्र होत. अनेक धनाढ्य व्यापारी तिथे माल दाबून होते. शिवाय बादशाह औरंगजेबाला इथून मोठया प्रमाणात कर जात असे. पण इथे स्वराज्यात अनेक शत्रूंची आक्रमणं आणि त्यामुळे होणारे युद्धे यात स्वराज्याचा खजाना रिता होत चालला होता.

स्वराज्य चालवायचं म्हणजे पैसा हा महत्वाचा आहेत. सुलतानांना किंवा मोघलांना याची चिंता नसे कारण ते रयतेवर वेगवेगळ्या प्रकारचे जुलमी कर लाडात असत किंवा गरज पडेल तशी जनते कडून खंडणी वसूल करत असत. पण शिवाजी महाराज तसे नव्हते. त्यांचे आपल्या सैन्याला स्पष्ट आदेश होते की, “मोबदला दिल्याशिवाय शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये”.

आणि म्हणूनच शिवाजी महाराजांना रयतेचा राजाम्हटले जाते. अनेक दिवसाच्या गंभीर खलबतांनंतर महाराजांनी स्वराज्याचा खजिन्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लुटीचा उपाय शोधून काढला. भारतात लुटीचा इतिहास अतिशय विनाशक आणि रक्तरंजित आहे. पण महाराजांनी सुरतेतील जनतेच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली. महिला, लहान मुले वृद्ध यांना पूर्ण संरक्षण दिले एवढेच काय तर मशिदी आणि चर्च ला सुद्धा या लुटीतून पूर्ण संरक्षण दिले गेले.

पुरंदरचा तह

सुरतेच्या लुटीनंतर औरंगजेबाचा पारा आणखीनचं चढला, काहीही करून शिवाजी महाराजांना रोखायला हवे असे त्याला वाटू लागले. तो दिल्लीत बसून शिवाजी महाराजांना पाहाडो का चूहाअसं म्हणायचा. पण औरंगजेबाचा सेनापती मिर्झाराजे जयसिंग याला चांगलेच ठाऊक होते की शिवाजी महाराज म्हणजे सह्याद्रिचा सिंहआहेत.

१६६५ साली आपल्या याच सेनापतीला औरंगजेबाने शिवाजीराजांवर आक्रमण करायला प्रचंड सैन्यासह पाठवले. इतक्या प्रचंड सैन्यासमोर महाराजांच्या प्रतिकार कमी पडला. अखेर निर्णायक लडाई नंतर पुरंदरचा तह करण्यात आला त्यात महाराजांना आपले २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले. त्याच बरोबर मुघलांचा तत्कालीन तख्त आग्रा येथे हजर होण्याचे कबूल करावे लागले. ही एक पाऊल मागे घेण्याची वेळ होती, आणि महाराजांनी एक पाऊल मागे घेतलं.

आग्ऱ्याहून सुटका

विजापूरकरांवर केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यासाठी १६६६ साली शिवाजी महाराजांना दिल्ली येते भेटीसाठी बोलवण्यात आले होते. आणि ते पुरंदरच्या तहावेळी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगाला कबूलही केले होते. ठरल्यानुसार महाराज आपल्या ९ वर्षाचा पुत्र संभाजी बरोबर दिल्लीत दाखल झाले. सुरुवातीला शिवाजी महाराजांचा व्यवस्थित मानसम्मान मिर्झाराजें द्वारा राखला गेला.

मात्र औरंगजेबाच्या वाढदिवशी त्याच्या दरबारात महाराजांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत मागच्या रांगेत उभे करण्यात आले. शिवाजी राजांचा उपमर्द करण्यात आला. या अपमानाचा जाब विचारण्यासाठी महाराज थेट औरंगजेबाच्या तख्ताकडे गेले आणि आपण मराठा स्वराज्याचा असा अपमान सहन करणार नाही असे औरंगजेबाला खडसाहून सांगितले. औरंगजेबाने त्यांना कैद करण्याचे आदेश दिले.

महाराजांना कैद करण्यात आल्यानंतर लवकरच त्यांची रवानगी मिर्झाराजे याचा पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली. शिवाजी राजांचा पूर्वइतिहास पाहता त्यांच्यावर दिवस रात्र कडक पहारा ठेवण्यात आला. सुटकेसाठी बोलणी करण्याचे अनेक प्रयत्न फसले. त्यावेळी महाराजांनाही फार प्रतिकार केला नाही. काही दिवस जाण्याची वाट पहिली.

काही दिवस गेल्यानंतर महाराजांच्या लक्षात आले कि पहारेकरी पहारा देण्यात कुचराई करत आहेत. महाराजही याचीच वाट पाहत होते, त्यांनीं एक योजना बनवली. त्यांनी आजारी असल्याचे ढोंग केले. प्रकृतिस्वास्थासाठी आग्र्यातील विविध मंदिरांना व दर्ग्यांना मिठाईचे पेटारे पाठवण्याचे सुरु केले. सुरवातीला तर प्रत्येक पेटारा पहारेकरी बारकाईने तपासून पाहत मात्र सवयीनुर पुन्हा पहारेकर्यांनी पेटार्यांनकडे दुर्लक्ष करण्यास सुरवात केले. शिवाजी महाराजांनी हि गोष्ट ताडली.

याच गोष्टीचा फायदा घेऊन एके दिवशी शिवाजी राजे व संभाजी पेटाऱ्यात बसून निसटण्यात यशश्वी झाले. कुणाला संशय येऊ नये म्हणून महाराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद शिवरायांचा पोशाख चढवून त्याची अंगठी दिसेल अश्या अवस्तेत बिछान्यात पडून होते. शिवराय दूरवर जाऊन पोहोचले याची खात्री झाल्यावर तो सुद्धा पहारेकर्यांना बगल देऊन निसटला.

बराच वेळ आत काहीच हालचाल होत नाही हे लक्षात आल्यावर पहारेकरी आत गेले असता तिथे कुणीही नव्हते. सत्य परिस्थिती लक्ष्यात समजली तो पर्येंत २४ तास उलटून गेले होते. स्वतः महाराज थेट स्वराज्यात न येता वेषांतर करून मथुरेला गेले. लहान संभाजी ला घेऊन प्रवास करणे धोक्याचे होते हे ओळखून त्यांनी संभाजींना एका विश्वासू व्यक्तीकडे ठेऊन, एक गोसाव्याच्या वेशात मजल दरमजल करत महाराष्ट्रात आले.

स्वराज्यात परतल्यावर संभाजी महाराजांचा वाटेत मृत्यू झाला अशी अफवा पसरवण्यात आली उद्देश असा होता की संभाजींना पाठलाग औरंगजेबाने सोडून द्यावा. झालेली तसेच काही काळानंतर संभाजी राजेही स्वराज्यात सुखरूप परत आले. मा जिजाऊंना हायसे वाटले. विशेष म्हणजे महाराजांच्या गैरहजेरीत सुद्धा महाराजांनी निवडलेल्या अष्टप्रधान मंडळा सोबत जिजाऊंची स्वराज्याचा कारभार उत्तम सांभाळला.

आग्र्याच्या सुटके नंतर महाराजांनी विजयी घोडदौड पुन्हा सुरु झाली. राजेंनी आपल्या अपमानाचा बदल घेण्यासाठी तहात दिलेले सर्वच्या सर्व किल्ले पुन्हा जिंकून घेतले. सर्वात आधी त्यांनी कोंढाणा जिंकून घेतला कोंढाण्याच्या या लढाईत तानाजी मालुसरे त्यांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली व त्यांना वीर मरण आले. तानाजीच्या स्मुर्तिप्रीत्यर्थ शिवरायांनी या गडाचे नाव सिंहगड ठेवले.

शिवराज्याभिषेक

आग्रावरून सुटल्यावर महाराजांना एक गोष्ट लक्ष्यात आली ते म्हणजे महाराज अभिषिक्त राजे नसल्याचे अनेक व्यावहारिक तोटे शिवरायांना व त्यांच्या साथीदारांना जाणवत होते. शिवाजीराजांनी अनेक जमिनींवर स्वामित्व स्थापन केलेले असले आणि अपार धन मिळविले असले तरी, त्यांच्याजवळ मजबूत लष्कर आणि नौदल असले आणि असंख्य सैनिकांवर त्यांचा हुकूम चालत असला तरी सैद्धांतिकदृष्ट्या त्यांची स्थिती ही राजासारखी नव्हती.

मुघल सम्राटाच्या लेखी ते फक्त एक जमीनदार होते, किंबहुना त्यामुळेच त्यांना किरकोळ कनिष्ठ सरदारांच्या रांगेत मागे उभे करण्यात आले होते. आदिलशहासाठी ते फक्त एका जहागीरदाराचे बंडखोर पुत्र होते. शास्त्रीयरित्या कोणत्याही राजासोबत समान दर्जाचा दावा ते आतातरी करू शकत नव्हते. तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामीनिष्ठेची वा भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते.

कारण अभिषिक्त राजा म्हणजे साक्षात देवचं असा भारतीय सामान्य जनतेचा दृष्टिकोन होता. राज्याभिषेकाशिवाय त्यांच्या आज्ञांना किंवा आदेशांना अखिल रयत गांभीर्याने घेईलच असे नव्हते. राज्याभिषेक झालेला नसल्याने कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे, विधीवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे व आपल्या राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते आपल्या राजकीय स्वराज्याला कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक करणे आवश्यक होते.

तर ऐतिहासिक कागदपत्रांवरून हेही स्पष्ट दिसून येते की सामाजिकदृष्ट्या भोसले घराण्याशी समान असलेल्या अनेक मराठा सरदारांमध्ये त्याकाळी मत्सराची भावना निर्माण झालेली होती हे नक्की. अर्थातच असे लोक स्वतःला शिवाजीराजांचे सेवक म्हणवून घेण्यास नकार देत होते व आपण आदिलशहाचे एकनिष्ठ सेवक आहोत असे म्हणत होते. त्यांच्या लेखी अजूनही शिवाजी राजे भोसले हे बंडखोर आणि स्वामीद्रोही होते.

अशातच त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठीही राज्याभिषेक करून घेणे गरजेचा होता. औपचारिक राज्याभिषेकामुळे अशा मत्सरी सरदारांना शिवाजी राजे भोसले हे आता छत्रपती आहेत आणि विजापूर व गोवळकोंड्याच्या शहांप्रमाणेच समान दर्जाचे राजे आहेत असा संदेश जाणे महत्वाचा होता.

प्राचीन हिंदू शास्त्राप्रमाणे केवळ क्षत्रिय वर्णातील व्यक्तीसच राजा म्हणून अभिषिक्त केले जाऊ शकत होते आणि अशी व्यक्तीच हिंदू रयतेचा राजा असल्याचा दावा करू शकत होती. पण मेख अशी होती कि महाराज कुणबी होते, एका शेतकरी कुळातील होते. त्यांचे भोसले कूळ हे क्षत्रिय म्हणून त्याकाळी गणले जात नव्हते. अर्थातच या शास्त्रांनुसार भोसले कूळ शूद्र होते आणि अशा कुळातील व्यक्तीस राजा होण्याचा अधिकार नव्हता.

काही ब्राम्हण मंडळींचा तर हाही आक्षेप होता कि परशुरामाने आधीच पुर्थ्वी २१ वेळा निक्षत्रिय करून झाली असल्यामुळे आता पृथ्वीलोक कुणीही क्षत्रिय उरला नाही. म्हणून महाराष्ट्रातील काही ब्राम्हणांनी त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक अधिकृतपणे त्यांना क्षत्रियजाहीर करून झाला तरच भारताच्या सर्व भागातील ब्राह्मण उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद देतील अशी परिस्थिती निर्माण झाली.

शूद्रकुलोत्पन्न म्हणून राज्याभिषेकासाठी आक्षेप घेणाऱ्यांची तोंडे बंद करू शकेल अशा पंडिताची म्हणूनच त्यावेळी महाराजांना गरज होती. विश्वेश्वर नामक पंडिताच्या रूपात ही गरज पूर्ण झाली. मूळचा पैठणचा असणारा हा ब्राम्हण कशी येथे वास्तव्यास होता या पंडिताचे टोपणनाव गागाभट्टअसे होते. सुरुवातीस काही आढेवेढे घेतल्यानंतर पंडित गागाभट्ट शिवाजी राजे भोसले यांना क्षत्रिय मानण्यास तयार झाले. पण त्यासाठी सहा कोटी रुपये दक्षिणेच्या रूपात देण्याचे त्याने ठरवून घेतले. दक्षिणा कसली लाचच ती.

क्षत्रिय घराण्याशी भोसले कुळाचा संबंध होता हे सिद्ध करण्यात बाळाजी आवजी आणि अन्य काही साथीदारांचा पुढाकार होता. त्यांनी भोसले कुळाची वंशावळी जुळवून भोसले कूळ हे प्रभू रामचंद्राच्या सूर्य वंशातील शुद्ध क्षत्रिय घराणे आहे हे सिद्ध केले. अशा भक्कम पुराव्यानंतर गागाभट्ट महाराष्ट्रात येऊन शिवाजी भोसले यांच्या राज्याभिषेकाचे प्रमुख पुरोहित म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास अखेर तयार झाले.

६ जून १६७४ रोजी रायगडावर शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे नवे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्याच्या कडून करणकौस्तुभनामक ग्रंथही लिहून घेतला.

राज्याभिषेकानंतर सेनापती प्रतापराव गुजर यांचा मृत्यू, प्रतापगडावर वीज पडणे, महाराजांची पत्नी काशीबाई यांचा मृत्यू, तसेच राज्याभिषेकानंतर केवळ बारा दिवसांनी राजमाता जिजाबाई यांचा मृत्यू इत्यादी घटना झाल्या, त्यामुळे गागाभट्टाने केलेल्या अभिषेकामधे काही चुका झाल्या अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. म्हणून सहकार्याच्या मागणीनुसार पुराणोक्त पद्धतीने महाराजांनी दुसरा राज्याभिषेक करून घेतला.

दक्षिण भारतात राज्यविस्तार

महाराजांचा राज्याभिषेक झाला शिवाजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज झाले. मात्र त्यानंतर अल्पावधीतच दिनांक १७ जून १६७४ रोजी जिजाऊ मांसाहेब यांचा मृत्यू झाला शिवरायांचा मोठा आधार गेला. महाराज छत्रपती झाले खरे पण मुघल बादशाह औरंगजेब स्वराज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता. तो स्वराज्याचा घास घ्यायला केंव्हा येईल याचा नेम नव्हता. यदाकदाचित जर औरंगजेब स्वराज्यावर चालून आला तर दक्षिणेत एखादे मजबूत सैनिक ठिकाण असावे असा महाराजांचा विचार होता.

इतिहासात पुढे आल्यावर आपल्याला कळलेच की राजाराम महाराजांसाठी जिंजी हे किती महत्वाचे ठिकाण होते. हा महाराजांच्या दूरदृष्टीचा पुरावा आहे. सावत्र भाऊ व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते. शहाजीराजांची कर्नाटकातील जहागिरीही त्यांच्याकडे होती. त्यांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची काही मदत मिळाली तर पहावे असा हेतू होता.

आदिलशहाची फारशी भीती आता राहिली नव्हती. शिवाजी राजेंचे कर्तृत्व बघून आणि ते आता हिंदूंचे अभिषिक्त छत्रपती आहेत याची जाण होऊन इतर शह्याही त्यांना मानसम्मान देऊ लागले होते. उदारणार्थ महाराज जेव्हा दाक्षितेत मोहिमेसाठी घेले तेंव्हा शिवरायांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशाहाची मदत मागितली. अशी मदत देण्याचे त्याने खुशीने कबूल केले.

दक्षिणेकडील मोहिमेदरम्यान गोवळकोंड्याच्या अबुल हसन कुतुबशहाने त्यांना भेटीचे आमंत्रण दिले. तेव्हा प्रथम कुतुबशहाच्या राजधानीला भेट देऊन मग दक्षिण दिग्विजयासाठी पुढे जायचे अशी योजना त्यांनी आखली. गोवळकोंडा हीच कुतुबशाहाची राजधानी होती. गोवळकोंड्यात कुतुबशहाकडून व त्याच्या प्रजाजनांकडून शिवाजी महाराजांचे जंगी स्वागत झाले. दरबारातही कुतुबशहाने महाराजांना खास तयार केलेल्या सिंहासनावर आपल्या बरोबरीने बसवले. स्वागतसत्कार स्वीकारल्यानंतर शिवराय कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले.

चेन्नईच्या दक्षिणेस जिंजीचा किल्ला आहे. रायगडाप्रमाणेच प्रचंड आणि मजबूत असलेला हा किल्ला वेढा घालून महाराजांनी जिंकला. त्यासोबतच दक्षिणेत स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले. नंतर शिवरायांनी वेल्लोरच्या किल्ल्याला वेढा दिला. कित्येक महिने वेढा देऊनही किल्ला ताब्यात येईना, तेव्हा वेल्लोरजवळच्या डोंगरावरून त्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला आणि किल्ला सर केला. त्यांनी कर्नाटकात एकूण वीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटे-मोठे किल्ले जिंकून घेतले.

यानंतर शिवाजी महाराजांनी आपले सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांना भेटीसाठी बोलावले. व्यंकोजीराजे या भेटीसाठी फारसे उत्सुक नव्हते. काही दिवस ते महाराजांसोबत राहिले, परंतु एका रात्री महाराजांना काही न कळवता तंजावरला निघून गेले आणि उलट महाराजांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा शिवरायांच्या फौजेने त्यांचा समाचार घेतला. व्यंकोजीराजांचा पराभव झाला. आपल्या भावाच्या अशा वर्तनामुळे महाराजांना दुःख झाले.

त्यांनी व्यंकोजीराजांना समजुतीची काही पत्रेही पाठवली. जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेश त्यांना दिला. त्यांची पत्नी दीपाबाई ही समजूतदार होती, तिने व्यंकोजींची समजूत घातली. महाराजांनी तिला चोळीबांगडीसाठी कर्नाटकातील थोडा प्रदेश दिला. महाराजांनी व्यंकोजीराजांना पत्रात लिहिले : परक्या शत्रूंचा भरवसा धरू नये. पराक्रमाचा तमाशा दाखवावा”.

आणि रायगड पोरका झाला

कर्नाटकातील विजय मिळवून महाराज रायगडावर परतले. या मोहिमेची दगदग जाणवत असतानाच वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांना जंजिऱ्याच्या सिद्दीविरुद्ध आरमारी मोहीम काढली. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराजे संस्थापक आहेत. त्याचे स्वतःचे आरमार असलेले ते पाहिले भारतीय राजे आहेत.

दरम्यान महाराजांना सततच्या दगदगीमुळे अस्वस्थ वाटू लागले. ते रायगरावरच आजारी पडले ३ एप्रिल १६८० रोजी महाराजांचा मुर्त्यू झाला आणि अखंड स्वराज्यासह रायगड पोरका झाला.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम